सत्ता गेल्यानंतरच शेतकऱ्यांची आठवण येते, स्वार्थासाठी आंदोलन करत असल्याचा शेतकरी नेते सिकंदर शहा यांचा आरोप

अमरावती : सत्तेच्या राजकारणात रमलेल्या माजी आमदार आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांच्यावर शेतकरी नेते सिकंदर शहा यांनी घणाघाती टीका केली आहे. गुवाहाटी वारी करून ‘पन्नास खोके एकदम ओके’ म्हणणाऱ्यांना सत्ता गेल्यावरच शेतकऱ्यांची आठवण येते का? असा थेट सवाल करत शेतकऱ्यांनी अशा सत्तेच्या लालसेने भरलेल्या नेत्यांपासून सावध राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
सध्या बच्चू कडू हे अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन करत आहेत. परंतु या आंदोलनामागेही सत्तेचा हेतू लपलेला आहे, असा आरोप शहांनी केला आहे.
शेतकऱ्यांप्रतीचा अचानक आलेला पुळका संशयास्पद – शहा यांचा आरोप
सिकंदर शहा यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, “जेव्हा बच्चू कडू सत्तेत होते, तेव्हा त्यांनी एकदाही शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नावर आवाज उठवला नाही. उलट ते सत्ताधाऱ्यांसोबत मंत्रीपदासाठी रस्सीखेच करत होते. त्यावेळी शेतकरी कोट्यवधी रुपयांचे नुकसान सहन करत होते.”
सरकारची धोरणं शेतकरीविरोधी, पण कधीच विरोध केला नाही
सिकंदर शहा यांनी भाजप सरकारवरही हल्लाबोल करत म्हटले की, केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने नेहमी शेतकरीविरोधी भूमिका घेतली आहे. त्यांच्या आयात-निर्यात धोरणामुळे शेतकऱ्यांचं दरवर्षी आर्थिक नुकसान होत आहे. “अशा सरकारचा भाग म्हणून बच्चू कडू मंत्री झाले होते, पण कधीच त्यांनी धोरणांचा विरोध केला नाही,” असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
आंदोलनामागे पुन्हा सत्तेचा डाव?
सत्ता गेल्यानंतर पुन्हा सत्तेची आस लागलेले नेते शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा उपयोग स्वतःच्या राजकीय पुनरागमनासाठी करत असल्याचा गंभीर आरोप शहांनी केला. “आंदोलन हे जर खरंच शेतकऱ्यांसाठी असते, तर त्यांची लढाई सत्तेच्या काळातही सुरू राहिली असती. पण आता सत्ता गेल्यानंतर हा पुळका उठतो, ही शेतकऱ्यांच्या भावना फसवणूक आहे,” असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन
शेतकऱ्यांनी आता जागरूक होणे गरजेचे असल्याचे सांगत शहा यांनी असे म्हटले की, “स्वार्थासाठी लढणाऱ्या, सत्ता गेल्यावरच ‘शेतकरी प्रेम’ जागवणाऱ्या नेत्यांपासून दूर राहा. ही वेळ आहे खरी आंदोलनं ओळखण्याची.”