अकोल्यात वादळी वाऱ्याचा कहर; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सभेला पावसाचा फटका

अकोला : अकोल्यात आज दुपारी वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. याचवेळी शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा सुरू होण्याच्या तयारीत होती. मात्र, हवामानाने अचानक पलटी घेतली आणि सभास्थळी काही काळासाठी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
मुख्यमंत्र्यांच्या सभेला येणाऱ्या नागरीकांची धांदल उडाली. सभेच्या ठिकाणी लावलेले बाजूचे काही पेंडॉल उडून गेले. वाऱ्याच्या जोरामुळे मंडपाच्या काही भागांमध्ये हालचाल झाली, मात्र सुदैवाने मुख्य सभामंडप वॉटरप्रूफ असल्याने मंच व इतर महत्त्वाचे उपकरण सुरक्षित राहिले.
पावसाचा जोर असला तरीही, मंडपाची मजबूत रचना आणि आयोजन समितीच्या तत्परतेमुळे सभा पूर्वनियोजित वेळेनुसार सुरू करण्यात आली. पावसातही नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती, आणि अनेकांनी छत्र्या व रेनकोटच्या साहाय्याने मुख्यमंत्री फडणवीस यांचे भाषण ऐकले.
मुख्यमंत्र्यांनीही आपल्या भाषणात या नैसर्गिक अडथळ्याचा उल्लेख करत नागरिकांचे आभार मानले की, “अशा परिस्थितीत देखील आपली उपस्थिती हीच आमचं बळ आहे.”