अमरावतीहून लक्ष्मीनारायण संस्थानच्या मानाच्या दिंडीचे १४ जून रोजी प्रस्थान

अमरावती : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ही महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेतील एक अनमोल शृंखला असून, यावर्षी हा पालखी सोहळा १९ जूनपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या श्री लक्ष्मीनारायण संस्थानची मानाची दिंडी १४ जून रोजी दुपारी ४ वाजता श्री लक्ष्मीनारायण मंदिर, भाजीबाजार येथून प्रस्थान ठेवणार आहे.
गेल्या १६० वर्षांपासून ही दिंडी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात १४व्या क्रमांकाने मानाच्या दिंडीप्रमाणे सहभागी होत आहे. सद्गुरू प.पू. श्री. विठ्ठलानंद सरस्वती महाराजांच्या प्रेरणेने विदर्भातून सुरू झालेली ही दिंडी परंपरा आजही भक्तीभावाने जोपासली जात आहे.
कार्यक्रमाचा तपशील:
१४ जून, दुपारी ३ वाजता – ह.भ.प. श्री. पद्माकर महाराज देशमुख यांचे प्रवचन
४ वाजता – दिंडी प्रस्थान सोहळा, श्री लक्ष्मीनारायण मंदिर, भाजीबाजार
स्व. नारायणराव व्यास यांच्या निवासस्थानी पादुकांचे पूजन (कुंभारवाडा)
मार्ग:
दिंडीचा प्रवास बजरंग चौक, निळकंठ चौक, आझाद हिंद मंडळ, अंबागेट, गांधी चौक, राजकमल चौक, राजापेठ मार्गे होणार असून, राजापेठनंतर मुक्काम ह.भ.प. देशमुख महाराज, चिमोटे लेआऊट, दस्तूरनगर येथील निवासस्थानी असेल.
सहभागी भक्त:
दिंडीमध्ये खारतळेगाव येथील दत्त मंदिराचे भक्त, तसेच शहर व ग्रामीण भागातील असंख्य वारकरी, भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. मार्गातील विविध ठिकाणी उत्साहात स्वागत होणार असून, वारकरी सांप्रदायाचा भगव्या पताका आणि टाळमृदुंगाच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिमय होणार आहे.
ऐतिहासिक पार्श्वभूमी:
पालखी परंपरेचा उगम संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पित्याच्या पंढरपूर वारीपासून झाला असून, १८३२ साली श्री गुरु हैबतबाबांनी दिंडी व पालखी सोहळ्याला स्वरूप दिलं. ही परंपरा इंग्रज कालीन पंचकमिटीकडून पुढे चालवली गेली. विदर्भात ही परंपरा सद्गुरू विठ्ठलानंद सरस्वती महाराजांनी सुरू केली आणि आज अमरावतीची दिंडी त्या परंपरेचा गौरवशाली भाग बनली आहे.