नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा तडाखा! केळी पिकांचे मोठे नुकसान – खासदार रवींद्र चव्हाण यांची पाहणी

नांदेड : नांदेड जिल्ह्यात वादळी वारा आणि जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे. अर्धापूर व मुदखेड तालुक्यांतील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, अनेक एकरवरील केळी बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. यामुळे सध्या काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होत शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.
खासदार रवींद्र चव्हाण यांचा दौरा – नुकसानग्रस्त भागाची पाहणी
या पार्श्वभूमीवर नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी आज अर्धापूर व मुदखेड तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
तात्काळ पंचनाम्याची मागणी – मदतीसाठी शासनाला अहवाल द्या
खासदार चव्हाण यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून अहवाल शासनाकडे सादर करण्याचे निर्देश दिले असून, शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली आहे.
वेदर स्टेशन अद्याप अपूर्ण – शेतकऱ्यांचे नुकसान थांबवण्यास अडथळा
चव्हाण म्हणाले की, “शासनाने वेदर स्टेशन कार्यान्वित करण्याची घोषणा केली होती, परंतु अद्यापही या सुविधांचा प्रत्यक्ष उपयोग शेतकऱ्यांना होत नाही. वेदर स्टेशन वेळेवर कार्यान्वित झाली असती, तर शेतकऱ्यांना हवामानाच्या बदलांची पूर्वकल्पना मिळून नुकसान टाळता आले असते.”
तांत्रिक यंत्रणा अपुरी, शेतकऱ्यांना आधार हवा
या भागातील शेतकऱ्यांनी हवामानाच्या अनिश्चिततेमुळे वाढणाऱ्या संकटांकडे शासनाचे लक्ष वेधले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने सद्य स्थितीचा अभ्यास करून सशक्त योजना राबवावी, अशी मागणी सर्वत्र होत आहे.