आरोग्य योजनेत राज्यातील सर्व नागरिकांचा समावेश डॉ. ओमप्रकाश शेटे यांची माहिती
अमरावती: राज्यातील नागरिकांना आरोग्य सेवा मिळावी, यासाठी आरोग्य योजनेत सर्व घटकांचा समावेश करण्यात आला आहे. यासोबतच सक्षम असलेल्या सर्व रूग्णालयांनी अर्ज केल्यास त्यांचे देखील संलग्नीकरण करण्यात येतील, अशी माहिती आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी दिली.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आज आयुष्मान भारत योजनेच्या अंमलबजावणीबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार प्रताप अडसड, प्रविण तायडे, राजेश वानखडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, जिल्हा शल्य चिकित्सच डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले आदी उपस्थित होते.
डॉ. शेटे म्हणाले, राज्य शासनाने राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. यात सर्व रेशनकार्डधारक पात्र असतील. एका कुटुंबाला 5 लाखापर्यंत मोफत उपचार मिळणार आहे. त्यासोबतच बहुतांश यात आजार समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व नागरिकांवर उपचार होतील. येत्या काळात नवसंजीवनी उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात राज्यभरातील 200 अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रीया करण्यात येणार आहे. यासाठी उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायीत्व निधीचा उपयोग केला जाणार आहे.
जिल्ह्यात 36 रूग्णालये अंगीकृत करण्यात आली असून राज्यात 2 हजार 31 रूग्णालये संलग्नित आहेत. येत्या काळात चार हजाराहून अधिक रूग्णालये यात जोडण्यात येतील. रूग्णांना सेवा देणाऱ्या रूग्णालयांनी अर्ज केल्यानंतर सक्षम असल्याची खात्री करण्यात येतील. या सर्वांना या योजनेत जोडण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अंगीकृत रूग्णालयांची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी गावपातळीवरील शासकीय कार्यालयांमध्ये याची यादी प्रसिद्ध करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.