डवरगाव (मोर्शी) येथे प्रहारचे अर्ध दफन आंदोलन – शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि दिव्यांग हक्कांसाठी सरकारचा तीव्र निषेध

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात येणाऱ्या डवरगाव येथे आज सकाळपासून प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अर्ध दफन आंदोलन सुरू केले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, तसेच दिव्यांगांच्या प्रश्नांची तत्काळ सोडवणूक या प्रमुख मागण्यांसाठी हे तीव्र आंदोलन छेडण्यात आले.
सकाळी ८.३० वाजता सुरू झालेल्या आंदोलनात ५० पेक्षा अधिक प्रहार कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते. त्यांनी स्वतःला अर्धतः जमिनीत पुरून सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवला. यावेळी “आमची मागणी मान्य न झाल्यास पूर्ण दफन आंदोलन करू,” असा इशाराही आंदोलकांनी दिला.
प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू सध्या गुरुकुंज मोझरी येथे अन्नत्याग आंदोलनावर आहेत. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत डवरगाव येथील कार्यकर्त्यांनी हा लढा उभारला. आंदोलनादरम्यान काही कार्यकर्त्यांनी मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या “गाळ्यात पेटवू” अशी तीव्र चेतावणीही दिली.
या आंदोलनात प्रहार नेते छोटू महाराज वसू, जोगेंद्र मोहोळ, अशोक लेंडे, मनीष करपकार यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
घटनेची गंभीर दखल घेत नायर तहसीलदार टीना चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी आंदोलकांना शांततेने समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांनी स्पष्ट सांगितले की “मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही.” अखेर तहसीलदारांच्या आश्वासनावर आंदोलन मागे घेण्यात आले आणि मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले.
डवरगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार वाघ साहेब यांच्या नेतृत्वात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संपूर्ण आंदोलन शांततेत पार पडले.