नांदेडमध्ये केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान – खासदार अशोक चव्हाण यांची बांधावर पाहणी

नांदेड: वादळी वारा आणि जोरदार पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील अनेक भागांत केळीच्या बागांना तसेच इतर पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. आज या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांनी केली. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
दुहेरी नुकसान – पीकही गेलं, दरही घसरले!
खासदार चव्हाण म्हणाले, “वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत, तर दुसरीकडे बाजारात केळी पडल्याने दर घसरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे.”
विम्याच्या पलिकडे मदतीचा प्रयत्न
“ज्यांच्याकडे पीक विमा आहे त्यांना शासनाकडून मदत मिळणार आहेच, मात्र ज्यांच्याकडे विमा नाही अशा शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई मिळाली पाहिजे यासाठी मी प्रयत्न करतो आहे,” असे चव्हाण यांनी सांगितले.
प्रशासकीय यंत्रणेला सूचना
जिल्हाधिकाऱ्यांशी नुकसानीबाबत चर्चा
महसूल मंत्री यांच्याशी मदतीसंदर्भात संपर्क
चुकीच्या ठिकाणी लावलेल्या पर्जन्यमापन केंद्रांचे पुनर्स्थापन करण्याचे निर्देश
शेतकऱ्यांची मागणी – एकरी ₹७५,००० नुकसान भरपाई
पाहणी दरम्यान उपस्थित शेतकऱ्यांनी, “एकरी किमान ७५ हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी,” अशी ठाम मागणी केली.
खासदारांचे आश्वासन:
“शेतकऱ्यांना योग्य ती आणि भरघोस मदत मिळावी, यासाठी लवकरच उच्चस्तरीय बैठक घेणार असून, केंद्र व राज्य सरकार दरबारी हा मुद्दा मांडणार आहे,” असे खासदार अशोक चव्हाण यांनी शेवटी सांगितले.
प्रतिनिधी : मनोज मनपुर्वे