वादळी वाऱ्यामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी केली पाहणी

यवतमाळ,: यवतमाळ जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामध्ये पुसद तालुक्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला असून, अनेकांचे केळी, कापूस आणि भाजीपाला यांसारखी पिके उध्वस्त झाली आहेत.
याच पार्श्वभूमीवर राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी पुसद तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. या दरम्यान त्यांनी प्रा. गोविंद फुके यांच्या शेतात जाऊन केळीच्या पूर्णपणे नष्ट झालेल्या पिकाची पाहणी केली.
राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळण्यासाठी प्रशासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल आणि शासकीय मदत मिळवून दिली जाईल, असे त्यांनी आश्वासन दिले.
या पाहणीदरम्यान स्थानिक अधिकारी, कृषी विभागाचे कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांनी या दौऱ्याचे स्वागत करत, तात्काळ पंचनामे करून मदतीसाठी धोरणात्मक पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे.