१५ जूननंतरच करा पेरणी; कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला

अमरावती : यंदाच्या खरिप हंगामासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाने महत्त्वाचा इशारा दिला आहे. सध्या विदर्भात वातावरण कोरडे असून तापमान ४२ अंशांवर आहे. मृग नक्षत्र सुरू झाले असले तरी पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी ८० ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे स्पष्ट आवाहन कृषी विभागाने केले आहे.
मान्सून रखडला, पेरणी थांबवा
दोन आठवड्यांपासून विदर्भात मान्सूनचा प्रवास रखडलेला आहे. १७ जूननंतर मान्सून गती घेण्याची शक्यता आहे, मात्र १४ जूनपर्यंत कोणतीही पर्जन्यमान वाढ अपेक्षित नाही, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. या दरम्यान पेरणी केली तर बियाण्यांची उगमशक्ती कमी होऊ शकते, त्यामुळे घरगुती बियाण्यांचा वापर करताना बीजप्रक्रिया करण्याचे आवाहनही कृषी विभागाने केले आहे.
शुकशुकाटामुळे बाजार ठप्प
बियाणे बाजारामध्ये सध्या शांतता पसरली आहे. शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पाऊस सुरू झाल्यानंतरच कृषी केंद्रांमध्ये खरेदी-विक्री वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, काही खतांच्या किंमतीत १० ते २५ टक्के आणि बियाण्यांमध्ये १० टक्क्यांपर्यंत दरवाढ झाल्याचे चित्र आहे.
प्रतिनिधी – नितेश किल्लेदार