अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करा – आमदार केवलराम काळे

अचलपूर : अचलपूर तालुक्यातील विविध गावांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, खासकरून केळीच्या बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार केवलराम काळे यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पथ्रोट, येणी पांढरी, जवळापूर आणि शिंदी बु. या गावांतील नुकसानीची पाहणी केली.
पंचनाम्याचे आदेश युद्धपातळीवर
नुकसानीची पाहणी केल्यानंतर आमदार काळे यांनी संबंधित प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. “शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई लवकर मिळावी यासाठी कोणतीही विलंब नको,” अशी स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.
पाहणी दौऱ्यात प्रमुखांची उपस्थिती
या पाहणी दौऱ्यात भाजप अचलपूर तालुकाध्यक्ष समीर हावरे, विशाल काकड, सुधीर रसे, अतुल वाठ, पठ्ठू दुबे, गोपाल गिल्डा, जवळापूर सरपंच वानखडे, अभिजित मोहरे, गणेशराव कडू, विनोद तिडके, सारंग शिसट यांच्यासह अचलपूरचे तहसीलदार श्री. गरकल, तालुका कृषी अधिकारी क्षीरसागर, मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक व महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर – आमदार काळे
“आपत्तीच्या काळात शासन जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. एकाही शेतकऱ्याला न्यायापासून वंचित ठेवले जाणार नाही. संबंधित यंत्रणांनी समन्वयाने आणि तातडीने काम सुरू करावे,” असे आवाहन आमदार केवलराम काळे यांनी यावेळी केले.
केळी बागांचे मोठे नुकसान
या परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे झाडे आडवे होणे, मुळे उपटणे आणि फळबागांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान प्रचंड असून त्यांना तातडीने मदतीची गरज आहे.