धामणगाव स्टेशनवर थंड पाण्याचे वाटप: जलसेवा भावी ग्रुपचे कार्य.

धामणगाव रेल्वे : धामणगाव येथील काही सेवाभावी महिला आणि पुरुषांनी एकत्र येत ‘जल सेवा भावी ग्रुप’ या नावाने एक सामाजिक उपक्रम सुरु केला असून, उन्हाळ्यात रेल्वे प्रवाशांसाठी थंड पाण्याचे मोफत वाटप सुरू केले आहे. या उपक्रमामुळे प्रवाशांना दिलासा मिळत असून, शहरातील नागरिकांकडून या अभिनव कार्याचे भरभरून कौतुक केले जात आहे.
उन्हाळ्याच्या कडाक्यात प्रवास करणाऱ्यांना थंड पाण्याची सर्वाधिक गरज असते. मात्र जनरल डब्यांतील गर्दी, वेळेची कमी आणि पाण्याची महागडी विक्री या सगळ्यांमुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. ही अडचण ओळखून, धामणगावातील महिलांनी पुढाकार घेत स्वतःचा वेळ आणि व्यवसाय बाजूला ठेवत सेवा देण्याचा निर्धार केला.
सेवाभावी जलसेवकांचा समर्पित उपक्रम:
प्रत्येक दिवस ठरलेल्या वेळेनुसार महाराष्ट्र एक्सप्रेस, अहमदाबाद एक्सप्रेस, विदर्भ एक्सप्रेस, मेल एक्सप्रेस अशा विविध गाड्यांच्या आगमनाच्या वेळेस हे स्वयंसेवक स्टेशनवर थंड पाण्याचे ड्रम, बॉटल्स व ग्लास घेऊन पोहोचतात. तेथून ते गाड्यांमध्ये जाऊन थेट डब्यांमध्ये गरजू प्रवाशांना थंड पाणी वाटतात. यामध्ये लहान मुलं, वृद्ध, महिलांना प्राधान्य दिले जाते.
स्थानिक प्रशासनाची साथ:
या सेवाभावी उपक्रमात धामणगाव रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्टर, रेल्वे सुरक्षा दल (RPF), रेल्वे कर्मचारी यांचेही सक्रिय सहकार्य लाभत आहे. ते या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवतात.
प्रवाशांचे आभार आणि कौतुक:
‘या उष्णतेत तुमचं हे पाणी अमृतसमान आहे’ असे शब्द प्रवाशांच्या तोंडून ऐकायला मिळतात. काही प्रवासी तर पुढे येऊन स्वयंसेवकांकडून पाणी घेऊन इतर प्रवाशांपर्यंत पोहोचवतात. त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि आभारच या सेवकांसाठी मोठं बळ बनले आहे.