अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात तातडीने पंचनामे करून भरपाई द्यावी – आमदार रवी राणा यांचे पालकमंत्र्यांना निवेदन

अमरावती : अमरावती जिल्ह्यात आणि शहर परिसरात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे, नागरीकांचे आणि बाजार व्यवस्थेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याची दखल घेत आमदार रवी राणा यांनी आज अमरावती दौऱ्यावर असलेल्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना अधिकृत निवेदन सादर करत नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
या निवेदनात शेतातील उभ्या पिकांचे, फळपिकांचे, भाजीपाल्याचे तसेच कृषी उत्पन्न बाजार समितींमध्ये साठवलेल्या मालाचे नुकसान, घरांची पडझड, व जनावरांची वाहतूक अशा प्रकारच्या नुकसानीचा उल्लेख करण्यात आला आहे.
पालकमंत्र्यांकडून तात्काळ कारवाईचे निर्देश
या निवेदनाची तातडीने दखल घेत महसूल मंत्री व अमरावतीचे पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना तातडीने सर्व नुकसानग्रस्त भागांचा पंचनामा करण्याचे आणि संबंधित लाभार्थ्यांना शासनाच्या नियमांनुसार नुकसान भरपाई देण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
या आदेशानुसार आमदार रवी राणा यांच्या कार्यालयाचे सचिव उमेश ढोणे यांनी आज (दि. १८ जून २०२५) जिल्हाधिकारी कार्यालयातील अधीक्षक लंकेश खटके यांच्याकडे लेखी आदेश सुपूर्त केला. त्यानुसार नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागाला तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
अधिकाऱ्यांकडून कारवाही अहवाल मागवला
सदर निवेदनात नमूद कारवाई झाल्यानंतर त्याबाबतचा अहवाल पालकमंत्र्यांना सादर करण्यात यावा, अशा स्वरूपाचे निर्देशही या पत्रामध्ये देण्यात आले आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनाकडून आता तातडीने पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.