महेश लांडगेंचा अजित पवारांना जोरदार टोला, फडणवीसांनी दिला सबुरीचा सल्ला

पिंपरी-चिंचवड : आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये श्रेयवादाचे राजकारण चांगलेच तापले आहे. शहराच्या विकासावरून भाजप आमदार महेश लांडगे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. “मी पैलवान आहे, कोणाला घाबरत नाही. समोरच्याला अंगावर घ्यायची सवय आहे,” असा आक्रमक इशारा देत लांडगेंनी अप्रत्यक्षपणे अजितदादांवर निशाणा साधला आहे.
महेश लांडगे म्हणाले, “पिंपरी चिंचवड शहराचा कायापालट करण्यात अनेकांचे योगदान आहे. आम्ही 2017 पासून सत्ता सांभाळत असून, त्यानंतर शहराच्या विकासात महत्त्वाची कामगिरी केली आहे. दिव्यांग भवन, रस्ते, पाणीपुरवठा आदी कामांमध्ये आमचा वाटा आहे. इतरांचे योगदान नाकारत नाही, पण आमचं कामही दिसायला हवं.”
अजित पवार यांच्या ‘३० वर्षात काय केलं’ या विधानावर टीका करताना लांडगे म्हणाले, “तुमच्याकडे लोकांनी सत्ता दिली नसती, तर काय केलं असतं? घंटा… म्हणजे देवळात जाऊन घंटा वाजवत बसले असता का?”
महेश लांडगे यांनी यावेळी शहरातल्या विकास प्रकल्पांमध्ये आपलंही नाव झळकावं अशी मागणी करत मुख्यमंत्र्यांकडे प्रोटोकॉलमध्ये बदल करण्याचीही विनंती केली. “आम्ही पारदर्शक काम करतो. पण जेव्हा श्रेय दुसरे घेतात तेव्हा संताप येतो,” असेही ते म्हणाले.
फडणवीसांचा सल्ला: “ये पब्लिक है, सब जानती है”
महेश लांडगेंच्या टीकेनंतर, माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना संयम आणि सबुरीचा सल्ला दिला. ते म्हणाले, “महेश लांडगे म्हणतात की काम आम्ही करतो आणि श्रेय दुसरे घेतात. पण मी सांगतो – ‘ये पब्लिक है, सब जानती है’. आपल्या कामाचं श्रेय कोणीही चोरू शकत नाही. तुम्ही काम करत राहा, जनता न्याय करते.”
त्याचवेळी फडणवीसांनी चिखलीतील वादग्रस्त टीपी प्रकरणाचा उल्लेख करत तो आराखडा तात्काळ रद्द करण्याचे निर्देश दिल्याचेही जाहीर केले.
संत तुकाराम पालखी प्रस्थान सोहळ्यात फडणवीसांची उपस्थिती
या पार्श्वभूमीवर, देवेंद्र फडणवीस आज देहू येथे संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित होते. त्यांनी महाराष्ट्राच्या संत परंपरेची महती सांगताना स्पष्ट केले की, “वारी म्हणजे विचारांची परंपरा आहे. ती जोपर्यंत सूर्य-चंद्र आहेत, तोपर्यंत टिकणारच आहे.”
इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेच्या कामावरही त्यांनी भर दिला आणि दोन एसटीपी प्रकल्पांचे लोकार्पण झाल्याची माहिती दिली.
राजकीय संदेश स्पष्ट – श्रेयवादाचे राजकारण तेजीत!
भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष पिंपरी-चिंचवडमध्ये आता अधिक उघडपणे रंगू लागला आहे. आगामी निवडणुकांमध्ये ही झुंज अधिक तीव्र होणार हे निश्चित आहे.