मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला! पुढचे तीन दिवस ‘कोसळधार’, ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागांचा इशारा

राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस बरसत आहेत. मुंबईतही पावसाने धडक दिली आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आज हवामानाचा कल काय आहे, हे जाणून घेऊयात.
मान्सून चार ते पाच दिवसापासून चांगलाच सक्रीय झाला आहे. त्यामुळं कोकणात गेले तीन दिवस मुसळधार पाऊस पडताना दिसत आहे. मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरदेखील मुसळधार पाऊस झालेला आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी मंगळवारी विदर्भाच्या उर्वरित भागासह संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. पश्चिम बंगाल आणि गुजरातमध्ये असलेल्या दोन कमी दाबांच्या क्षेत्रांमुळं विश्रांती घेतल्यानंतर मान्सूनने प्रगती केली आहे. मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. मान्सून पुन्हा सक्रीय झाला असून विदर्भाचा भाग वगळता उर्वरित संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे.
जूनच्या पहिल्या आठवड्यात जोरदार हजेरी लावून मान्सूनने पुण्याची या महिन्याची सरासरी ओलांडली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) नोंदवहीनुसार संपूर्ण जूनमध्ये पुण्यात सरासरी 173 मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा महिना संपण्यास अद्याप 13 दिवस राहिले असताना मंगळवारी रात्री साडेआठपर्यंत 175.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या दोन दिवसाच्या तुलनेत शहरात पावसाचा जोर ओसरला आहे पुढील दोन दिवस आकाश सामान्य ढगाळ राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
जून निम्मा सरला तरी फक्त आठ टक्केच झाल्या पेरण्या
सुमारे तीन आठवडे एकाच ठिकाणी रेंगाळलेल्या मान्सूनचा प्रवास सुरू झाल्यानंतर विदर्भ, मराठवाडा, तसेच उत्तर महाराष्ट्रात पावसाने सर्वत्र हजेरी लावली आहे. परिणामी खरीप पिकांच्या पेरण्यांना वेग आला आहे. आतापर्यंत 11 लाख 70 हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. सरासरी क्षेत्राच्या हे प्रमाण आठ टक्के इतके आहे. सर्वाधिक पेरण्या पुणे विभागात एकूण क्षेत्राच्या 20 टक्के झाल्या असून, त्याखालोखाल कोल्हापूर विभागात 15, लातूर व नाशिक विभागात प्रत्येकी 12 टक्के पेरण्या झाल्या आहेत. कोकण विदर्भ, तसेच मराठवाड्याच्या काही भागांत अजूनही पावसाची प्रतीक्षा असल्याने, पेरण्यांना अद्यापही वेग आलेला नाही.