४५ तास बोगद्यात अडकले, बचाव पथक तोंडावर, पण.. आठ जणांची जीवन-मृत्यूशी झुंज

तेलंगणाच्या नागरकुरनूल जिल्ह्यातील एसएलबीसी प्रकल्पांतर्गत बांधण्यात येणाऱ्या बोगद्याचा एक भाग कोसळल्याने ८ लोक गेले ४५ तास आत अडकले आहेत. भारतीय सेना, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि इतर एजंन्सी रेस्क्यू ऑपरेशन चालवत आहेत. मात्र त्यांना अजूनही अडकलेल्या भागापर्यंत पोहचण्यात यश मिळाले नाही. दरम्यान बोगद्यात अडकलेल्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली जात आहे.
तेलंगणाचे मंत्री जे. कृष्णा राव यांनी सांगितले की बोगद्यात खूप मोठ्या प्रमाणात चिखल साचला आहे. ज्यामुळे आत जाणे अवघड झाले आहे. बोगद्याच्या आत गेलेल्या कृष्ण राव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, रेस्क्यू टीम या चिखलातून पुढे जाण्यासाठी रबर ट्यूब आणी लाकडांच्या फळ्यांचा वापर करत आहे. आम्ही सध्यातरी काही सांगू शकत नाही.आम्हाला आशा आहे.आत अडकलेल्या लोकांच्या वाचण्याची शक्यतेविषयी अंदाज लावू शकत नाही. राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये बाचाव कर्मचाऱ्यांना चिखल, लोखंडी सळ्या, सिमेंटचे तुकडे यांच्यामधून रस्ता बनवताना दिसले.
तेलंगणाचे मंत्री उत्तम कुमार रेड्डी यांनी सांगितले की, शनिवारी सकाळी ७० लोक बोगद्याच्या आत काम करत होते. दुर्घटनाानंतर बहुतांश लोक हे आत असलेल्या ट्रेन किंवा लोकोमोटिव्हच्या मदतीने बाहेर निघाले. मात्र ८ लोक अजूनही बेपत्ता आहेत. त्यांनी सांगितले की बोगद्याचा शेवटचा २०० मीटर भाग हा पाणी आणि चिखलाने भरलेला आहे. ज्यामुळे बचावकार्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. मोठ्या यंत्रांना आत नेणे शक्य नाही. त्यामुळे इतर पर्यायांचा वापर करुन चीखल हटवण्याचे काम सुरू आहे.
सुत्रानुसार, बोगद्यातील भाग कोसळल्यानंतर १३ किलोमीटर आत पोहचण्यात बचाव पथकाला यश आले आहे. आत अडकलेल्या लोकांच्या नावाने हाका मारल्या मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. बोगद्याच्या आत दोन इंजिनिअर, दोन ऑपरेटर आणि चार कामगारांचा समावेश आहे. यातील ४ जण झारखंड , २ उत्तर प्रदेश, १ जम्मू काश्मीर तर एक पंजाबचे रहिवासी आहेत.
बचाव कार्यात ४ एनडीआरएफच्या टीम, २४ सैन्याचे जवान, एसडीआरएफचे जवान आणि इतर एजंन्सीचे जवान कार्यरत आहेत. या सर्वांच्या अथक प्रयत्नामुळे बोगद्याच्या आत १३ किलोमीटर जाता आले आहे. मात्र आत अडकलेल्या लोकांची स्थिती २०० मीटरचा चीखल आणि पाण्याचा अवघड टप्पा ओलांडल्यावरच कळू शकणार आहे.