LIVE STREAM

AmravatiLatest News

वर्तमान काळात तरूणांनी शिवाजी होण्याची गरज – डॉ. राजेश मिरगे

  

 आज जगात लोकशाहीपुढे दडपशाहीचे संकट उभे आहे. लोकशाही संकटात येते तेव्हा छत्रपतींचे विचार आणि कार्य त्याला पर्याय ठरतात. या पाश्र्वभूमीवर सर्वसामान्य माणसाचा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे स्थान महत्वाचे आहे. लोककल्याणकारी राजाची भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांनी कसोशीने निभावली. राजपद भोगतांना चमत्कारिक अथवा विलाशीपणाला स्पर्श केला नाही. रयतेच्या विकासाची दृष्टी ठेवून लोकराज्याची निर्मिती केली आणि अनेक योजनांचा अवलंब करून रयतेला स्वाभिमानाने जगण्याचे धडे दिले. छत्रपतींचा इतिहास आजच्या तरुणांनी अभ्यासला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत:च्या जीवनात अंगीकारलेले कार्य आणि केलेला विचार यांची सांगड घालुन प्रत्येक तरुणांनी वर्तमान काळात शिवाजी महाराज होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. राजेश मिरगे यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागांतर्गत एम. ए.छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा व व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 जयंती निमित्ताने विभागाच्यावतीने आयोजित कार्यशाळेच्या द्वितीय सत्रात ‘शिवाजी महाराजांचे सामाजिक कार्य व विचारांचे वर्तमानातील महत्त्व’ या विषयावर व्याख्यान देतांना प्रमुख वक्ता म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. संदीप राऊत, प्रमुख अतिथी म्हणून अधिसभा सदस्य डॉ. रवींद्र मुंद्रे उपस्थित होते.
            ते पुढे म्हणाले, शिवाजी महाराजांनी जातीनिर्मूलन, अंधश्रद्धानिर्मूलन अशा अनिष्ट बाबींना फाटा देऊन सर्वधर्मसमभाव, समता, बंधुता ही मूल्य सतराव्या शतकात जनमानसात रुजवण्याचे महत्त्वाचे कार्य केले. रयत आणि राजा यांच्यात एकात्मभाव निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आजच्या तरुणांनी आपल्या कृतीतून समाजात पोहचवावे.
             प्रमुख अतिथी अधिसभा सदस्य डॉ. रवींद्र मुंद्रे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि कार्यातील साम्यस्थळे उपस्थितांसमोर मांडली. प्रारंभी स्वागतसमारंभानंतर प्रमुख वक्त्यांचा परिचय डॉ. वैभव मस्के यांनी करून दिला.
             अध्यक्ष भाषणात डॉ. संदीप राऊत म्हणाले, वर्तमान काळात एक नवा परंतु सम्यक बदल घडवून आणावयाचा असेल तर शिवाजी महाराजांचे विचार, कार्य व व्यवस्थापन या त्रयींची नितांत गरज असून युवा पिढी ती पूर्ण करू शकते. संचालन प्रा. वैभव जिसकार, आभार प्रा. वृषाली जवंजाळ यांनी मांनले. कार्यशाळेला अमरावती शहरातील अभ्यासक, विभागातील विद्यार्थी तसेच राज्यभरातील बरेच विद्यार्थी उपस्थित होते.
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!