LIVE STREAM

Latest NewsMaharashtra Politics

अन्नधान्य वितरण व शिधापत्रिकासंबंधित ऑनलाईन कामकाजातील तांत्रिक अडचणी दूर करा – आ.सौ.सुलभाताई खोडके

मुंबई :- राज्य विधिमंडळाच्या मार्च २०२५ च्या अर्थसंकल्पिय अधिवेशन जोरात सुरु असून अमरावतीच्या आ.सौ. सुलभाताई संजय खोडके या अधिवेशनाच्या कामकाजात चांगल्याच सक्रिय झाल्या आहेत. जनतेच्या हिताच्या दृष्टीने त्यांनी अधिवेशनात मांडलेल्या प्रश्नांना मंत्रीमहोदयांच्या वतीने समर्पक अशी उत्तरे दिली जात आहे. दरम्यान अन्नधान्य वितरण प्रणालीच्या बाबतीत प्रश्न उपस्थित करतांना राज्यात अनेक ठिकाणी रेशनकार्ड मॅनेजमेंट सिस्टीम बंद असल्याबाबत वितरण व्यवस्थेत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या सर्व तांत्रिक अडचणी दूर करून अन्न धान्य वितरण प्रणालीमध्ये पारदर्शकता निर्माण करण्याची मागणी आ.सौ.सुलभाताई खोडके यांनी अधिवेशनाच्या निमित्ताने केली आहे.

राज्यात अनेक ठिकाणी अन्न नागरी पुरवठा विभागामार्फत सुरु असलेली रेशनकार्ड मॅनेजमेंट सिस्टीम (RCMS) ही वेबसाईट गत दोन-तीन महिन्यांपासून बंद आहे. तसेच रेशन दुकानात बसविण्यात आलेल्या ई-पॉज मशिन मधील तांत्रिक अडचणी, सर्व्हर समस्या तसेच थम्ब कन्हेक्टीव्हीटीच्या समस्येमुळे धान्य पुरवठा बंद झाला असून राज्यात जवळजवळ २५ लाख शिधापत्रिकाधारक यामुळे बाधित झाले आहेत. या कारणास्तव पात्र शिधापत्रिकाधारकांना रेशनधान्यापासून वंचित राहावं लागत आहे. अशी माहिती आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी आपल्या प्रश्नातून मांडली आहे. त्याच बरोबर नवीन शिधापत्रिका काढणे, नाव कमी करणे वा समाविष्ट करणे , उत्पन्नाचे निकष, दुबार शिधापत्रिका काढणे ,आधार संबंधित कामे, वैद्यकीय उपचारासाठी लागणारे दाखले इत्यादी अनेक कामे सुद्धा प्रलंबित असल्यामुळे पात्र शिधापत्रिकाधारकांना शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यात देखील अनेक अडचणी निर्माण झाल्या असल्याची बाब आमदार महोदयांनी आपल्या प्रश्नाच्या माध्यमातून शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. अन्न नागरी पुरवठा विभागामार्फत सुरु असलेली रेशनकार्ड मॅनेजमेंट सिस्टीम (RCMS) ही वेबसाईट बंद असल्यामुळे वितरण प्रणालीत पारदर्शकतेचा अभाव व धान्याचा काळाबाजार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर वेबसाईट तात्काळ सुरु करण्यात यावी, ई-पॉज मशिन, सर्व्हर,थम्ब कनेक्टीव्हीटी बाबत तांत्रिक अडचणी दूर करुन सुरळीत धान्य पुरवठा करण्याची मागणी आमदार महोदयांनी अधिवेशनाच्या निमित्ताने केली आहे.

या संदर्भात शासनाच्या वतीने लिखित उत्तर देतांना राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी सांगितले की, अन्न नागरी पुरवठा विभागातील रेशनकार्ड मॅनेजमेंट सिस्टीम (RCMS) व आधार इनेबल पब्लिक डिस्ट्रिब्युशन सिस्टीम ( AePDS) आणि इतर प्रणाली या केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सूचना केंद्र अर्थात NIC क्लाउडवर स्थलांतरीत (Cloud Migration) करण्याची प्रक्रिया माहे, डिसेंबर, २०२४ मध्ये सुरु असल्याने ई-पॉज मशिनद्वारे अन्नधान्य वितरणास व शिधापत्रिकासंबंधित ऑनलाईन कामकाज करतांना तांत्रिक अडचणी आल्या आहेत. तसेच, केंद्र शासनाच्या आधार प्रणालीमध्ये देशपातळीवर तांत्रिक समस्या असल्याने लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण करतांना काही अडचणी उद्भवल्या आहेत. या संदर्भातील तांत्रिक अडचणी दूर करून वितरण प्रणाली सुरळीत करण्याबाबत लोकप्रतिनिधी कडून मागणी होत आहे. त्याअनुषंगाने केंद्र शासनाच्या राष्ट्रीय सूचना केंद्र (NIC) यांना उचित सूचना देण्यात आल्या आहेत. सद्यःस्थितीत विभागातील प्रणालींचे Cloud Migration ची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या आहेत. माहे डिसेंबर, २०२४ व जानेवारी २०२५ मध्ये सरासरी ९२% अन्नधान्याचे वितरण लाभार्थ्यांना करण्यात आले असल्याची माहिती मंत्रीमहोदयांच्या वतीने लिखित उत्तरातून देण्यात आली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!