औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकारचं संरक्षण, कबर हटवण्याचा अध्यादेश काढण्याची हिंमत आहे का? संजय राऊतांचा थेट वार; म्हणाले,’विहिंप, बजरंग दल आरएसएसचे पिल्लं!

इतिहास नष्ट करण्याचे काम सुरू आहे. ही थडगी असायला पाहिजे. हा आमच्या शौर्याचा इतिहास आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण तापले आहे. औरंगजेबाची कबर काढून टाका या मागणीसाठी आता विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलही आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. औरंगजेबाची कबर शासनाने लवकरात लवकर हटवावी, या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आज राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.
संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात, देशात राज्य कोणाचे आहे? त्यांचेच आहे. मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे कोणाचे आहेत, या विचारांच्या लोकांचे आहेत. मग त्यांना कबर हटवायला कोणी अडवलं? शासनाने हटवावी ना. मारामाऱ्या कशाला करता? नाटकं कशाला करता? लोकांना त्रास का देता? आरएसएसला सांगा फर्मान काढा. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद हे आरएसएसचेच पिल्लं आहेत, भाजपची पिल्लं आहेत. मग हे सगळं वातावरण खराब करून लोकांना त्रास देण्यापेक्षा तुम्ही शासकीय अध्यादेश काढा, हिंमत आहे का काढायची? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
औरंगजेबाची कबर पाहावी, मग महाराष्ट्राच्या वाट्याला यावं
या क्षणी औरंगजेब कबरीच्या भोवती केंद्र सरकारचा पोलीस दल आहे. मग ते का ठेवला संरक्षणासाठी? केंद्र सरकारचे पोलीस दल आणि ती जागा सरकारच्या अखत्यारीत आहे. तुम्ही आजचा सामनाचा अग्रलेख वाचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय शौर्य या महाराष्ट्राला, देशाला दाखवलं, त्याचे स्मारक म्हणजे औरंगजेबाची कबर. महाराष्ट्रावरती हल्ला करणाऱ्याआधी किंवा महाराष्ट्राचे पंगा घेण्याआधी त्या व्यक्तीने संभाजीनगरला जावे आणि औरंगजेबाची कबर पाहावी. मग महाराष्ट्राच्या वाट्याला यावं, असं आम्ही सांगतो.
ही थडगी असायला पाहिजे
छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची कबर खणलेली आहे ती कबर बघा आणि मग महाराष्ट्राच्या नादाला लागा. हा इतिहास आहे. ज्याला इतिहासाचे भान नाही, असे सगळे इतिहासाच्या बाबतीत रंडके असलेली लोक आहेत ते हे करत आहेत. अफजलखानाचा कोथळा महाराजांनी काढला. इतिहासाला ते पिढीला माहिती पाहिजे. हे दिवटी पोरं आहे, त्यांना पैसे पुरवतात, ही सगळी काही लोक आणि उद्योग करतात. इतिहास नष्ट करण्याचे काम सुरू आहे. ही थडगी असायला पाहिजे, हा आमचा इतिहास आहे. हा आमच्या शौर्याचा इतिहास असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.