देशाला आजही क्रांतिकारी विचारांची गरज – डॉ. राजेश मिरगे विद्यापीठात शहीद दिनानिमित्त व्याख्यान
अमरावती :- शस्त्र अथवा रक्तरंजीत क्रांती भगतसिंह यांनाही मान्य नव्हती, तर भांडवलवाद, साम्राज्यवादाऐवजी समाजवादी समाजनिर्मिती पाहिजे होती, त्यामुळे भगतसिंह यांच्यासारख्या क्रांतिकारी विचारांची देशाला आजही गरज आहे, असे प्रतिपादन संत साहित्य व इतिहासाचे अभ्यासक डॉ. राजेश मिरगे यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील विद्यार्थी विकास व राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे शहीद दिनानिमित्त आयोजित ‘शहीद-ए-आझम भगतसिंग : एक क्रांतिकारी झंजावात’ या विषयावर व्याख्यान देतांना ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, प्रमुख अतिथी म्हणून व्य.प. सदस्य डॉ. भैय्यासाहेब मेटकर, डॉ. विद्या शर्मा, अधिसभा सदस्य डॉ. प्रशांत विघे, प्रा. कैलास चव्हाण उपस्थित होते.
विषयाची मांडणी करतांना डॉ. मिरगे म्हणाले, धर्मनिरपेक्ष आणि स्वतंत्र भारताचे भगतसिंग यांचे स्वप्न होते. रायगडावर जावून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन तेथूनच त्यांनी प्रेरणा घेतली. अनेक ग्रंथांचे वाचन त्यांनी केले. अऩेक पुस्तकेही त्यांनी लिहिलीत. अनेक वृत्तपत्रांमध्ये त्यांनी बलवंत नावाने लेखन केले होते. क्रांतीचं तत्वज्ञान म्हणजे नवीन व्यवस्था निर्माण करणे हे होते. नॅशनल असेम्ब्लीमध्ये बॉम्बस्फोट करण्यामागे त्यांना त्यांचे ध्येय दाखविणे होते, बुध्दी, ज्ञान, तर्क या तत्वांवर समाजनिर्मिती त्यांना हवी होती. भगतसिंह यांना झालेली फाशीची शिक्षा ही तत्कालीन राजकीय परिस्थितीतून झाली होती. मात्र त्याहीवेळी त्यांनी चेह-यावर स्मितहास्य आणून इन्क्लाब जिंदाबाद हा आईचा शब्द पूर्ण केला, असेही डॉ. मिरगे यांनी यावेळी सांगितले.
शुभेच्छापर मनोगत व्यक्त करतांना डॉ. भैय्यासाहेब मेटकर म्हणाले, ऐतिहासिक क्षणाचं स्मरण व्हावं, शहीदांच्या बलिदानाचे स्मरण आणि विचारांचे अऩुकरण व्हावे, या हेतुने असे कार्यक्रम आयोजित केले जातात. तरूण वयातच भगतसिंह यांना प्राण त्याग करावे लागले. स्वातंत्र्यपूर्व काळात हिंसा व अहिंसा असे दोन प्रकार जरी गणले जात असले, तरी त्यांचा उद्देश केवळ देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे हाच होता, त्यामुळे शहीदांचे बलिदान कदापि विसरता येणार नाहीत. अधिसभा सदस्य प्रा. कैलास चव्हाण म्हणाले, भगतसिंह यांनी तरूण वयातच देशासाठी बलिदान दिले. आजच्या युवकांना क्रांतिकारकांचे विचार, त्यांचे राष्ट्रप्रेम अंगिकारले पाहिजे. जनमानसांपर्यंत त्यांचे विचार पोहचले पाहिजे.
अध्यक्षीय भाषण करतांना कुलसचिव डॉ. अविनाश असनारे म्हणाले, शहीदांच्या महान कार्यापासून युवकांनी प्रेरणा घ्यावी. आपण देशासाठी काय केले पाहिजे, देश विकासामध्ये युवकांचा सहभाग व पुढाकार उल्लेखनीय राहिला आहे. विद्यापीठातील विद्याथ्र्यांसाठी यापेक्षाही अधिक भव्यदिव्य असा कार्यक्रम व्हावा, जेणेकरुन विद्याथ्र्यांना मोठे दालन मिळेल, अशी सूचना करुन त्यांनी पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
शहीद भगतसिंह, सुखदेव, राजगुरू, संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन करुन विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविकातून व्याख्यानाच्या आयोजनामागील भूमिका विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर यांनी सांगितली. सूत्रसंचालन श्रीकृष्ण पखाले यांनी, तर आभार रा.से.यो. संचालक डॉ. निलेश कडू यांनी मानले. सर्जेराव फरपट यांनी गायिलेल्या देशभक्ती गीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाला अधिसभा सदस्य डॉ. सुभाष गावंडे, व्य.प. सदस्य डॉ. नितीन चांगोले, डॉ. पंजाबराव देशमुख अर्थव्यवस्था नियमन केंद्राचे समन्वयक डॉ. महेंद्र मेटे तसेच विविध महाविद्यालयांमधील कार्यक्रम अधिकारी, प्राध्यापकवृंद, विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.