नुकसान भरपाईच्या मदतीसाठी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयात ठिय्या

मोर्शी : मोर्शी तालुका विक्रमी संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून मोठ्या प्रमाणात संत्रा उत्पादक असलेल्या मोर्शी तालुक्यात गेल्या वर्षी सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे संत्रा पिकांच्या नुकसान भरपाई मिळण्याकरिता महसुल यंत्रणेमार्फत जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत विविध व्हिके नंबर च्या याद्या प्रसिद्ध करून लाभार्थी संत्रा शेतकऱ्यांना आवाहन करून सेतू केंद्रातून ई-केवायसी करायला सांगीतली. त्याला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ई-केवायसी केली. मात्र त्यावर दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला तरी अजूनही नुकसानग्रस्त संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा झाली नसल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानासाठी तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा शासनाप्रती रोष वाढत असून शासनाने त्वरित संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात फळगळती अनुदान मदत तात्काळ संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयात ठिय्या देऊन उप विभागीय अधिकारी प्रदीप कुमार पवार, तहसीलदार विनोद वानखडे यांना निवेदन देऊन करण्यात आली.
आंबिया बहराच्या संत्र्याची गळती होऊन शिल्लक राहिलेला संत्रा कवडीमोल भावाने विकावा लागला, तर दुसरीकडे तालुक्यातील संत्रा बागांवर मृग बहार संत्रा नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. कृषी कर्ज भरण्याकरिता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. शेतकऱ्यांना कृषी कर्ज भरायचे असल्याने त्याकरिता या अनुदानाची रक्कम मिळेल व आपल्या जवळील काही रक्कम टाकून कर्जाची परतफेड करता येईल, असा विचार संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी केला होता. परंतु, शासनाने त्यांच्या विचारांवर पाणी फेरले. शासनाचे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मदतीपासून वंचित ठेवल्यामुळे मोर्शी तालुक्यातील असंख्य गारपिटग्रस्त, अतिवृष्टीग्रस्त संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही. त्यांची नुकसान भरपाई मदत ८ दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्यास अन्नत्याग आंदोलनाचा ईशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य रुपेश वाळके ग्रामपंचायत सदस्य सचिन उमाळे अतुल काकडे मंगेश होले सुरेश ढोमणे यांच्यासह आदी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी उप विभागीय अधिकारी प्रदीप कुमार पवार, तहसीलदार विनोद वानखडे यांना निवेदन देऊन देण्यात आला.
नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाल्यामुळे कर्ज भरणे शक्य होत नसल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळेल व आपल्या जवळील काही रक्कम टाकून कर्जाची परतफेड करता येईल ते सुद्धा शक्य झाले नसल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई मदत तात्काळ जमा करावी.