परकीय शत्रूपासून मोठा त्रास वाढणार, ऑगस्टमध्ये नुकसान करणारा पाऊस…; ‘भेंडवळ’च्या घटमांडणीत वर्तवले धक्कादायक अंदाज

बुलढाणा : शेतकरी व राजकारणी यांच्यासाठी बहुप्रतिक्षित असलेली बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ गावची भेंडवळची मांडणी काल (30 एप्रिल) संपन्न झाली. भेंडवळच्या घट मांडणीत शेतीविषयक, राजकीय परिस्थिती, देशाची आर्थिक स्थिती, देशाची संरक्षण स्थिती याविषयी वर्षभराचे अंदाज वर्तवण्यात येतात. आज सकाळी सूर्योदयावेळी या मांडणीचे अंदाज वर्तविण्यात आलेत. भेंडवळची मांडणी ही 370 वर्षांपासून ची स्थानिक परंपरा आहे त्या परिसरातील शेतकरी भेंडवळच्या मांडणीच्या अंदाजानंवर विश्वास ठेवून वर्षभराच्या पीक पाण्याचे नियोजन करत असतात. यावर्षी भेंडवळच्या मांडणीत अनेक अंदाज वर्तवण्यात आलेत.
भेंडवळ घटमांडणी वर्तविण्यात आलेले अंदाज…
- या वर्षी पीक पाणी सर्वसाधारण असून, कापूस पिकावर रोगराई जास्त असेल, तर इतर पिके साधारण येतील यात गहू, हरबरा, उडीद मुंग, ज्वारी, तूर.
- शेतमालाला भाव मिळणार नाही, मंदी असेल.
- -यंदा पाऊस जून महिन्यात साधारण तर जुलै महिन्यात भरपूर पाऊस, ऑगस्टमध्ये नुकसान करणारा पाऊस असेल तर सप्टेंबरमध्ये भरपूर पाऊस असेल.
- यंदा देशात नैसर्गिक जसे पूर, भूकंप, युद्धजन्यआपत्तीचं प्रमाण जास्त असेल
- देशात मोठ्या प्रमाणात आर्थिक टंचाई असेल.
- राजा कायम असेल पण कायम तणावात असेल.
- यंदा पिके साधारण राहणार असून, पावसाळा चांगला असेल.
- परकीय शत्रूपासून मोठा त्रास वाढणार आहे.
घटमांडणीला शास्त्रीय आधार आहे का?
घटमांडणीला कुठलाही शास्त्रीय आधार नसला तरी आजही परंपरेनं बळीराजाच्या मनातील महत्त्व कमी झालेलं नाही. भेंडवळची प्राचीन घटमांडणी परंपरा विज्ञानाच्या आधुनिक युगातही जपली जात असून, याच भविष्यवाणीविषयी शेतकऱ्यांमध्ये कमालीची उत्सकता पाहायला मिळते. घटमांडणीनंतर वर्तवलेली पाऊस, पीक-पाणी, राजकीय, आर्थिक भाकितं बऱ्याचदा खरी ठरली आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीला निव्वळ ठोकताळे म्हणत असले, तरी शेतकऱ्यांचा भेंडवळ घटमांडणीवर दृढ विश्वास कायम आहे.
घटमांडणी नेमकी कशी करतात?
भेंडवळच्या घटमांडणीची परंपरेनुसार एक विशिष्ट पद्धत आहे. शेतात मध्यभागी खोल खड्डा करुन त्या खड्ड्यात मातीचा घट मांडण्यात येतो. घटात चार मातीची ढेकळे, त्यावर पाण्याने भरलेली घागर आणि घागरीवर पापड, भजा, वडा, सांडोई, कुरडई ठेऊन घटाच्या बाजूला पान सुपारीसह विविध 18 प्रकारची धान्ये मांडली जातात. घटाच्या वर्तुळाकार अठरा धान्ये गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली, करडी मसूर, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा ही धान्ये मांडली जातात.