पंतप्रधानांच्या विश्वासाला तडा! मूर्तिजापूर रेल्वे स्थानकात ठेकेदारांचा निकृष्ट दर्जाचा कारभार उघड
मूर्तिजापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आलेल्या मूर्तिजापूर रेल्वे स्थानकाच्या विकासकामांमध्ये ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचे काम केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत साकारलेल्या नव्या स्थानकात पहिल्याच पावसात पाण्याच्या गळतीने प्रवाशांना त्रस्त केलं असून, विशेषतः तिकीट बुकिंग प्रवेशद्वाराजवळील गळतीने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण पसरले आहे.
पायाभूत सुविधा झाल्या अपुऱ्या!
या स्थानकात दिव्यांगांसाठी सुविधा, वेटिंग रूम, नविन शौचालये आणि बसण्यासाठी जागा अशा आधुनिक सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, या कामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही ठिकाणी भिंतींची फाटकी अवस्था, छतांतून होणारी गळती, आणि अपूर्ण कामे पाहता ठेकेदारांनी पंतप्रधानांच्या ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’ घोषणेलाच हरताळ फासल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
उद्घाटनाच्या उपस्थितीत मोठे नेते, पण कामांत हलगर्जीपणा
या उद्घाटन सोहळ्यास खासदार अनुप धोत्रे व आमदार हरीश पिंपळे हे मान्यवर उपस्थित होते. मोठ्या घोषणांचा गाजावाजा झाला असला तरी प्रत्यक्षात ठेकेदारांनी बेजबाबदारपणे काम केल्याचे स्पष्ट होत आहे.
ठेकेदारांवर चौकशीची मागणी
स्थानिक नागरिक व प्रवाशांकडून या संपूर्ण विकासकामांबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, तसेच दोषी ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. इतक्या मोठ्या निधीचा वापर करून साकारलेलं हे स्थानक जर पहिल्याच पावसात गळायला लागलं, तर यामागे भ्रष्टाचाराचा स्पष्ट आढळ असल्याचे सांगितले जात आहे.
प्रतिनिधी – गुलाम मोसीम