संतोष शेंडे यांना ‘उत्कृष्ट कृषी पत्रकारिता’ पुरस्कार – राज्यस्तरीय राजीव गांधी कृषीरत्न पुरस्काराने गौरव

टाकरखेडा संभू : राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान, अमरावती यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय ‘राजीव गांधी कृषीरत्न पुरस्कार २०२५’ यंदा ‘उत्कृष्ट कृषी पत्रकारिता (प्रिंट मीडिया)’ या संवर्गात श्री. संतोष शेंडे (टाकरखेडा संभू) यांना प्रदान करण्यात आला. कृषी पत्रकारितेतील त्यांच्या अभ्यासपूर्ण, प्रयोगशील व समाजप्रबोधनात्मक कार्याबद्दल हा सन्मान त्यांना सपत्नीक विशेष प्रमाणपत्र देऊन करण्यात आला.
संतोष शेंडे यांनी शेतकऱ्यांच्या जीवनातील समस्यांवर नेमकं लक्ष केंद्रित करत त्यांच्या बातम्यांमधून तांत्रिक, सामाजिक आणि आर्थिक पैलूंना अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडले. शेतकऱ्यांच्या आत्मविश्वासाला बळ देणारी आणि मार्गदर्शक ठरणारी त्यांची पत्रकारिता राज्यभरात कौतुकास पात्र ठरली आहे.
कार्यक्रमात मान्यवरांची उपस्थिती:
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिजामाता कृषी भूषण पुरस्कार विजेती पोर्णिमा सवाई यांनी केले. सूत्रसंचालन गोपाल कडू यांनी केले तर आभारप्रदर्शन तालुका कृषी अधिकारी उत्कर्षा भोसले यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाला सरपंच रश्मी देशमुख, उपसरपंच प्रदीप शेंडे, कृषी पर्यवेक्षक अमोल सराड, वैभव कुमार जाधव (ऑल इंडिया डेव्हलपमेंट हेड, आयडियल ॲग्री सर्च), भिवसन बकाल, गणेश बकाल, दिलीप काळे, भैय्यासाहेब निचळ, राहुल तायडे, विवेक मोहोड, सौरभ मानकर, अतुल भुस्कडे, वृजेश सवाई, प्रशांत ठाकरे, बल्लू पाटील, अनुउल्ला खान आदींसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.