होमगार्ड जवानांचे प्रश्न जैसे थे – शेकडो जवानांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पुन्हा निवेदन सादर
अमरावती (प्रतिनिधी) – होमगार्ड जवानांच्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने निवेदन देऊनही प्रश्न जैसे थेच राहिले आहेत. त्यामुळे आज पुन्हा एकदा मेजर राजेंद्रसिंह बघेल यांच्या नेतृत्वात शेकडो होमगार्ड जवानांनी अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
सण-उत्सव, निवडणूक बंदोबस्तासाठी तत्पर, पण नोकरी मात्र तात्पुरतीच
६ डिसेंबर १९४६ रोजी मुंबईत स्थापन झालेल्या या पथकात आजही शेकडो जवान राज्यभरात सेवा बजावत आहेत. पोलीस बंदोबस्त, निवडणुका, उत्सव, मिरवणुका अशा प्रत्येक महत्वाच्या प्रसंगी रात्रंदिवस सेवा देणाऱ्या या जवानांना सरकारकडून फक्त काही दिवसच ड्युटी दिली जाते, ३६५ दिवसांची नियमित नोकरी नाही, याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला.
निवेदनातील प्रमुख मागण्या
होमगार्ड जवानांना ३६५ दिवस नियमित ड्युटी द्यावी.
दर महिन्याच्या ७ तारखेपूर्वी मानधन बँक खात्यात जमा करावे.
प्रशिक्षित होमगार्ड जवानांना पोलीस मदतनीस, वाहन चालक, डायल 112 सेवेत ड्युटी द्यावी.
दर ३ वर्षांनी होणारी पुनर्नियुक्ती प्रक्रिया त्वरित बंद करावी.
रेल्वे स्टेशन, विमानतळ, शासकीय दवाखाने, कार्यालये इथे ड्युटीची संधी द्यावी.
सरकारकडे न्यायाची मागणी
या निवेदनाद्वारे होमगार्ड जवानांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी ठाम भूमिका मांडली असून, शासनाने त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. मानधन वेळेवर मिळावे आणि नियमित ड्युटीचे आश्वासन दिले जावे, हीच या शेकडो जवानांची मागणी आहे.