श्री लक्ष्मी नारायण मंदिराचा 150वा जयंतोत्सव: “हे मंदिर केवळ वास्तू नसून ईश्वराची साक्षात अनुभूती” — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुंबईतील माधवबाग येथील श्री लक्ष्मी नारायण मंदिराच्या 150व्या जयंतोत्सव सोहळ्यास काल विशेष महत्त्व प्राप्त झाले, जेव्हा केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र उपस्थिती लावली. या ऐतिहासिक मंदिराच्या स्थापनेला 150 वर्ष पूर्ण झाल्याने संपूर्ण परिसर भक्तिभावाने न्हालेला दिसून आला.
कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,
“हे मंदिर केवळ दगड-विटांची वास्तू नसून, येथील कणाकणात ईश्वर आहे. मंदिरात अखंडित सेवा, गोसेवा, समाजसेवा यामुळेच या वास्तूचे पावित्र्य कायम आहे. आज या पवित्र स्थळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सोबत दर्शनाचा लाभ मिळाल्याने मी स्वतःला भाग्यवान समजतो.”
मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंदिराच्या उभारणीत आणि जतनात योगदान देणाऱ्या दानशूर व्यक्तींचे स्मरण करत त्यांचे आभार मानले. त्यांनी माधवबाग ट्रस्टच्या उपक्रमांना शुभेच्छा देत आश्वासन दिले की,
“भविष्यात मदतीची आवश्यकता भासल्यास आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू.”