मध्यरात्री गोवंश वाहतूक थांबवली! गोरक्षकांनी केला पाठलाग, पोलिसांवर गंभीर आरोप

अकोला : अकोल्यातील बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्रीच्या सुमारास मोठा प्रकार उघडकीस आला आहे. टाटा सुमो वाहनातून कत्तलीसाठी नेत असलेल्या गोवंशांची सुटका गौरक्षकांनी केली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांची भूमिका देखील संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
गुप्त माहितीवरून पाठलाग – ६ गोवंशांची सुटका
गौरक्षकांना मिळालेल्या माहितीनुसार, एका टाटा सुमो वाहनातून गोवंशांची वाहतूक होत होती. तत्काळ त्या वाहनाचा पाठलाग करून गाडी अडवण्यात आली, आणि सहा गायींची सुटका करण्यात आली. गौरक्षकांच्या म्हणण्यानुसार, या गोवंशांना कत्तलीसाठी निर्दयीपणे नेत असल्याचा स्पष्ट संशय आहे.
वाहनचालकांनी पोलिसांच्या मदतीने पळ काढल्याचा आरोप
घटनेदरम्यान, वाहनात असलेले काहीजण वाहन सोडून पळून गेले, आणि गौरक्षकांनी असा आरोप केला की, या पळून गेलेल्या आरोपींना पोलिसांची मदत मिळाली. याच पार्श्वभूमीवर एका पोलिस कर्मचाऱ्यांवर सीमेजवळून वाहन सोडून देण्याचा आरोप करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ – पोलिसांवर गंभीर आरोप
या घटनेशी संबंधित गौरक्षक आणि पोलिस कर्मचाऱ्यांमधील संभाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पोलिसांच्या भूमिकेबाबत गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
गाड्यांची तोडफोड – कायदा हातात घेतल्याचा प्रश्न
या कारवाईदरम्यान गौरक्षकांनी गोवंश वाहतूक करणाऱ्या गाडीची तोडफोड केल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे आता गौरक्षकांवरही कायदा हातात घेतल्याचा आरोप होत आहे. यासंदर्भात पोलीस तपास सुरू असून, दोन्ही बाजूंचा खुलासा अद्याप होणे बाकी आहे.