अकोल्यात दोन गाईंना जीवनदान, गाळात फसलेल्या गायींची सुटका.
अकोला : बार्शीटाकळी तालुक्यातील जणुना गावात एक हृदयस्पर्शी आणि सत्कार्याची घटना घडली आहे. गावातील धरण परिसरात गाळात अडकलेल्या दोन गाईंचा जीव गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे वाचवण्यात आला आहे. ही घटना गावकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
घटनेची माहिती अशी की, पाण्याच्या शोधात धरण परिसरात गेलेल्या दोन गाई गाळात फसल्या. त्यांची परिस्थिती लक्षात आल्यानंतर स्थानिक जय सेवालाल गौरक्षण संस्थानचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोरीच्या सहाय्याने अथक प्रयत्न करून दोन्ही गाई सुरक्षितपणे बाहेर काढल्या.
या रुक्षण मोहीमेत गावातील तुकाराम राठोड, संतोष राठोड, मंगेश राठोड, सौरव राठोड, गौरव राठोड आणि ओम चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले. गाईंच्या जीवाला धोका निर्माण झाला असताना या युवकांनी धाडसी पाऊल उचलत गाईंचे प्राण वाचवले.
गावकऱ्यांनी या प्रयत्नांचे भरभरून कौतुक केले असून, या कार्यकर्त्यांच्या कामगिरीमुळे समाजात जनजागृतीचं मोठं उदाहरण निर्माण झालं आहे.