बच्चू कडूंवर जिल्हा बँकेत भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; संचालक रवींद्र गायगोले यांचा थेट आरोप

अमरावती : अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या कथित भ्रष्टाचारावरून माजी आमदार व माजी बँक अध्यक्ष बच्चू कडू पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. जिल्हा बँकेचे संचालक रवींद्र गायगोले यांनी बच्चू कडूंवर थेट भ्रष्टाचार, पदाचा गैरवापर, आणि कुटुंबीयांना लाभ देण्याचे आरोप लावले आहेत.
न्यायालयीन शिक्षा असूनही बँकेच्या निवडणुकीत सहभाग?
संचालक गायगोले यांनी दावा केला की, “बच्चू कडूंना दोन वर्षांची न्यायालयीन शिक्षा असूनही त्यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली. यासाठी त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव टाकून गैरप्रकार घडवले.”
त्याच अनुषंगाने, आता बच्चू कडूंना जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र ठरवण्यात आले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नफा कमावणाऱ्या बँकेत भ्रष्ट कारभार?
“अमरावती जिल्हा बँक ही पूर्वी कधीच तोट्यात नव्हती. मात्र बच्चू कडू अध्यक्ष झाल्यानंतर बँकेची स्थिती ढासळली. त्यांनी स्वतःच्या कुटुंबातील लोकांना बिनधास्त कामे दिली आणि त्यांना अनियमित पद्धतीने सदस्य बनवले,” असा गंभीर आरोप गायगोले यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
नवीन अध्यक्ष निवडीची शक्यता
या पार्श्वभूमीवर लवकरच अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नवीन अध्यक्ष पदासाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे. बच्चू कडूंना अपात्र ठरवल्यानंतर बँकेच्या कार्यकारणीत बदल अपेक्षित आहेत.
गायगोले यांची मागणी
“संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी,” अशी मागणी करत संचालक रवींद्र गायगोले यांनी सरकार आणि सहकार खात्याकडे अधिकृत तक्रार दाखल करण्याचा इशाराही दिला आहे.