अकोला जिल्ह्यातील दाळंबी गावात तीव्र पाणीटंचाई; नागरिकांचा जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन
अकोला : अकोला जिल्ह्यातील दाळंबी गावातील नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करत आपला रोष व्यक्त केला आहे. गावात गंभीर पाणीटंचाई निर्माण झाल्याचा आरोप आंदोलक ग्रामस्थांनी केला आहे.
पाणी विकत घेण्याची वेळ ग्रामस्थांवर
ग्रामस्थांनी सांगितले की, सध्या गावात पिण्याचे पाणी मिळत नसल्याने त्यांना पैसे देऊन पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. गरिबी रेषेखालील अनेक कुटुंबांना यामुळे मोठा आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे.
जलजीवन मिशनचे काम पूर्ण, तरीही पाणी नाही!
गावात काही दिवसांपूर्वी जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यात आली होती. मात्र, पाण्याच्या टाकीत अद्यापही विद्युत पुरवठा न झाल्याने, पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष?
टाकी तयार असून देखील वीज जोडणीसाठी कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही, असा ठपका ग्रामस्थांनी प्रशासनावर ठेवला आहे. यामुळे नागरिकांना उन्हाळ्यात मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
पाणी हक्कासाठी ठिय्या आंदोलन
या सर्व परिस्थितीला कंटाळून ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या सीईओ यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडले. “अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले,” असा आरोप करत पाणी मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.