वलगावमध्ये महावितरण कार्यालयाला आग: वीज खंडित होण्याच्या त्रासातून दोन तरुणांचे कृत्य!
वलगाव : अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथे वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या दोन तरुणांनी थेट महावितरणच्या कार्यालयात घुसून पेट्रोल टाकून आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आज दुपारी १२ वाजता वलगाव येथील (K.V.) उपकेंद्रात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.
संतप्त तरुणांचा थेट आक्रमण – कार्यालयाची तोडफोड आणि आगजनी
अविनाश निर्मळ आणि विनीत तायडे या दोन तरुणांनी महावितरण कार्यालयात घुसून प्रथम खिडक्या आणि टेबलांची तोडफोड केली. नंतर टेबलावर पेट्रोल ओतून आगीचा भडका लावला. यात दोन टेबल्स आणि अनेक शासकीय दस्तावेज जळून खाक झाले आहेत. संतप्त तरुणांनी कार्यालयातील रजिस्टर व कागदपत्रे फेकून दिली होती.
शासकीय अभियंत्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न
घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, आरोपींनी उपविभागीय अभियंता गोपाल विनायक इंगळे यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने इंगळे वेळीच पळून गेल्याने मोठा अनर्थ टळला. त्यांनी तत्काळ वलगाव पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली.
गुन्हा दाखल – दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत
वलगाव पोलिसांनी त्वरित कारवाई करत गुन्हा क्र. १७२/२०२५, दिनांक १५/०६/२०२५ रोजी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९(१), १३२, ३२६(G), ३५१(२), ३५२, ३५३(५) व सार्वजनिक मालमत्ता हानी प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून, न्यायालयाने त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यावर संताप – पण कायद्याचे उल्लंघन अक्षम्य!
स्थानिकांनी वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याबाबत तक्रारी केल्या होत्या, मात्र प्रशासनाकडून तातडीने तोडगा न निघाल्यामुळे संताप उसळल्याचे बोलले जात आहे. तथापि, प्रशासनावर दबाव आणण्यासाठी हिंसक मार्ग स्वीकारल्यामुळे कायद्याचे उल्लंघन झाले असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे वलगाव पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.