LIVE STREAM

AmravatiLocal News

स्त्री सक्षमीकरणासाठी जिजाऊंचे विचार प्रज्वलित करण्याची गरज – डॉ.अविनाश असनारे

  समाज समृद्ध बनविण्यासाठी अनेक स्त्रियांनी आपले कर्तृत्व पणाला लावले. त्यात संत परंपरेतील स्त्रिया जशा आहेत, तशाच ऐतिहासिक परंपरेतील लढाऊ स्त्रियाही होऊन गेल्या. त्यामध्ये राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब यांचे नाव अग्रक्रमाने घेतल्या जाते. स्वराज्य निर्मितीचा दूरदृष्टीकोन ठेवून शिवरायांच्या मनात माणुसकी, नैतिकतेचे संस्कार करतानाच संकटावर व प्रतिकुल परिस्थितीवर मात करून जीवनात वाटचाल करण्याचे धैर्यही त्यांच्या मनात निर्माण करण्याचे कौशल्य माँ साहेब जिजाऊ यांनी विकसित केले. अश्याच प्रकारचे कौशल्य, धाडस, नेतृत्व आणि विकासदृष्टी आजच्याही महिलांमध्ये निर्माण व्हावी, यासाठी जिजाऊंचे आदर्श विचार समाजात प्रज्वलित करण्याची गरज असल्याचे मत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी व्यक्त केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या एम.ए. छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा व व्यवस्थापन या अभ्यासक्रमाच्यावतीने माँ साहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय भाषण करतांना ते बोलत होते. व्यासपीठावर अमरावती शहराच्या आमदार सौ. सुलभाताई खोडके, सुप्रसिद्ध निवेदिका क्षिप्राताई मानकर, विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील आदी उपस्थित होते.
            डॉ. असनारे पुढे म्हणाले, आजच्या स्त्रिया प्रत्येक क्षेत्रामध्ये अस्तित्व निर्माण करून स्वतःची ओळख निर्माण करीत आहे. शिक्षण, क्रीडा, संगीत, राजकारण आणि समाजकारणात पुरुषांच्या बरोबरीने नावलौकिक करीत आहे. ज्या प्रमाणे जिजाऊंनी आपल्या संस्कारातून स्वराज्य निर्मितीसाठी शिवरायांना प्रोत्साहित करून एक आदर्श निर्माण केला, त्याचप्रमाणे समाजातील प्रत्येक स्त्रियांनी आपले नैतिक कर्तव्य म्हणून आपल्या मुलावर संस्कारमय मूल्ये बिंबवून त्यांच्यामध्ये मानवी संवेदना निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, अशी आशाही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली. प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश डॉ. मंजुषा बारबुध्दे यांनी स्पष्ट केला. सूत्रसंचालन डॉ. अश्विनी राऊत यांनी तर आभार प्रा. वृषाली जवंजाळ यांनी मानले.
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!